एका स्त्रीच्या अंगात आले की ते लोण संसर्गजन्य होऊन चहूकडे पसरते. संसारात दाबून ठेवलेले तिचे अस्तित्व असे रूप घेते. एरवी तर ती विरघळून गेलेली असते. संसारात गुपिते राखायची, छिद्रे बुजवायची. प्रकाशाची पणती सतत तेवती ठेवायची, स्वतः अंधार अनुभवायचा. “भारतीय संस्कृती” या पुस्तकात साने गुरुजी म्हणतात, “स्त्री म्हणजे मूर्तिमंत कर्मयोग. तिला जणूं स्वतंत्र अशी इच्छा नाही. घरची इच्छा, ती तिची इच्छा. पिसाळलेले कुत्रे जसे आपल्याच दातात लसलसणारे विष कोठेतरी ओतावे म्हणून चावायला धावते, तसेच माणसाचे आहे. स्वतःचे काम-क्रोध कोणावर तरी ओतावेत, असे त्याला वाटत असते. ते ओतले म्हणजे तो शांत होतो. हे विष ओतायची जागा म्हणजे घर. घरातील स्त्री, पत्नी म्हणते, घरात काहीही करा. जगात नीट वागा. आणा सारी घाण घरात, मी काढायला समर्थ आहे. तुमच्यातील काम, क्रोध, पशुत्व माझ्याठायी होमा. तुमचे पशुत्व होमण्याची मी पवित्र वेदी आहे. बाहेर जाल ते माणूस होऊन जा. पत्नी पतीला माणसाळविते, शांत-स्थिर करून आळा घालते.” साने गुरुजींचे हे विचार कदाचित कोणाला पटणार नाहीत. पण आजही बहुजन समाजातील स्त्रिया अशाच भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करतात. समाजातील एक गट सुसंस्कृत, सुशिक्षित असला तरी स्त्रीची व्यथा समांतर असते.
पद्मा गोळे एका कवितेत म्हणतात-
“…. तिच्या श्वासाशिवाय घरचे पानसुद्धा हलत नाही
तरी तिच्या अस्तित्वाची जाण कुणालाही होत नाही
एकाच मात्र तिला लागते: नैवेद्य जगावेगळा आणि तोही एकांतात शेल्याने झाकलेला
घरामधले सारे दुःख, अपमान, अशांतता
निगुतीने वाटून घेते हीच आपल्या ताटात स्वतः
असे दुःख गिळत ती मनाचे मोहोळ पिळीत असते
त्या मधात सगळे घर नाहीत असते, पोहत असते!”
शांत, स्थिर कमळ फुलवणाऱ्या सरोवरासारख्या स्त्रीच्या मनात मात्र कुठेतरी “स्व” केंद्रबिंदू हलता, जागता असतो. साऱ्याच जखमा बुजत नाहीत. काही उगवून वर येतात. तिला हिरवे होऊन फुलण्याची संधी मिळाली की मातीची ढेकळे फोडून ती उमलू बघते. परंतु समाजमन जाणून असल्यामुळे तिला पक्के ठाऊक असते की उमलत्या मनावर फुंकर घालण्याऐवजी बहुधा नांगर फिरविला जाईल. म्हणूनच ती आधार घेते त्या जगदंबेचा. मळवट, चुडा ल्यालेली ती कधी उग्र, तर कधी सौम्य, तर कधी पिसाट होते. सभोवतीचा काळोख उलथवून टाकीत दीपकळी होण्याचा प्रयत्न करते. तिच्या या रुपापुढे माणूस नमतो. क्षणकाळ का होईना, दोन हात जोडून तिचे मनोगत जाणून घेतो. तिला जगण्याचा तेवढाच दिलासा पुरेसा असतो. देवी अंगात येणाऱ्या बायका बघितल्या की मला गलबलून येते. स्त्रीची हि अवस्था काळाने संपवून टाकावी असे वाटते.