अशक्यप्राय मानण्यात आलेले काही कुणी शक्य करून दाखविले तर त्यातून उत्सर्गासारखा एक आशावाद जन्मतो आणि नंतर त्याचा कायम गुणाकार होत जातो. 
 
“केवळ माडीयांच्याच नव्हे, तर आम्हा सर्वांच्याही दृष्टीने एक महत्वाची गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे, कार्यात आत्मीयतेचा भक्तिभाव नसला तर अमाप भौतिक साधने हाती असून देखील शासनासारखी एक अवाढव्य व्यवस्था असफल होते आणि निष्ठेने भारावलेला मूठभर माणसांचा एक समूह तोकड्या साधनांनिशीही त्यापेक्षा सहस्रपट मोठे आव्हान पेलण्यात बरेचसे यश मिळवितो.”
 
आमच्या जवळ सर्वांगीण विकासासाठी लागणारी सगळी भौतिक साधन संपत्ती आहे आणि हवी ती बुद्धिमत्ताही आहे. उणीव आहे ती प्रयोजनाची. प्रयोजनाचे प्रेरणेत रूपांतर व्हावे म्हणून लागणारा आशावाद आमच्यात अभावाने आहे आणि उणीव आहे तो पुरविणाऱ्यांची. लोकबिरादरी फुलली तीही सहभागी झालेल्या सहस्र हातांनी. पण असे व्हायला निमित्त म्हणून का होईना, कुणी प्रवर्तक लागतो किंवा एखादा प्रेषित. लेखातून, भाषणातून, विचारातून प्रयोजन आणि आशा देता येते. पण या आशेत आणि तिच्या प्रत्यक्ष प्रयोगात अन्नाची कल्पना आणि प्रत्यक्ष अन्न एवढे अंतर असते. आणि भुकेलेल्यांच्या दृष्टीने ते महत्वाचे असते. कल्पना ही नेहेमीच अमूर्त असते म्हणूनच ती समजत असली तरी उमगत नसते. आशा ही अखेर एक कल्पनाच! ती जाणवावी म्हणून सगुण व्हावी लागते. म्हणून ती जेव्हा प्रकाश आणि मंदा यासारखा मानवी देह धारण करते तेव्हा तिला आशय येऊन ती प्रेरणादायी होते.
 
त्यांच्या कार्याचे मोल किती प्रश्न किती प्रमाणात सोडवले या आकारमानातून मोजणे अनाठायी आहे. खरे तर आज माडीयांचे प्रश्न पूर्वीपेक्षा गडद झालेत आणि अनेक तर नव्यानेच उगवलेत आणि उगवतच आहे. हे अपयश नसून उलट तो यशाचा पुरावा आहे. अधिक भूक लागते हा प्रकृतीत सुधारणा होते आहे याचा पुरावा असावा तसा. परिवर्तनात प्रश्नांचा नेहमीच गुणाकार होतो, जुन्या उत्तरांचेच नवे प्रश्न होतात. 
 
नवी मळवाट नवीनच घाट
नवीन क्षितिजे पहा अफाट
खोल दडपणे पूर्ण उलगणे
नव्या निर्झरा फुटते वाट … मुक्तिबोध. 
 
– कांचनमृग – मनोहर सप्रे- तरुण भारत – आसमंत- १० ऑगस्ट, २००८