आनंदयात्री-रवीन्द्रनाथ
“राष्ट्राचे आणि मानवाचे आदर्श उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या वज्रदन्डावर आपल्या वाणीचा ध्वज केला, आणि त्याच्यावर आपल्या राष्ट्राची स्वप्ने चितारली आणि त्यांतून विश्वशांतीचे परमचक्र फिरते ठेवले.”

“अमर आनंदाकडे, अपार आनंदाकडे जाणाऱ्या यात्रीला ही अशीच वाट चालावी लागते. पण त्यांच्या रक्तबंबाळ पावलांच्या ठशागणिक मंगलाची चिरसुंदर रक्तकमळे उमललेली असतात आणि त्यांतूनच युगांच्या चैतन्याचा सुगंध दरवळत असतो.”

“जीवनात एका सश्रद्ध प्राणशक्तीपुढे बाकी सर्व शक्ती कःपदार्थ आहेत या विषयी ते निःशंक होते. त्यामुळे जेत्यांच्या शस्त्रास्त्रांची किंवा कुटीलांच्या छद्मायुधांची तमा त्यांना कधीच वाटली नाही. राष्ट्राच्या आदर्शाचे आपण रखवालदार आहोत, मानवाच्या स्वप्नाचे किमयागार आहोत आणि त्याच्या भवितव्याचे शिल्पकार आहोत असा अभंग आत्मविश्वास घेऊन ते आले होते. आपण ईश्वराचे लाडके आहोत आणि त्याने या महान कामगिरीवर आपली योजना केली आहे हे त्यांनी प्रतिभेच्या पहिल्याच साक्षात्कारात ओळखले होते. पण त्यासाठी ईश्वरदत्त प्रतिभेवर विसंबून चालणार नाही. आपल्याला आपल्या जीवनाचीच यज्ञवेदी करावी लागेल आणि त्यात हवीही आपण आणि ज्वालाही आपणच याचा प्रत्यय क्षणोक्षणी घ्यावा लागेल हेहि त्यांनी ओळखले होते. हे भान क्षणभर सुटू न दिल्यामुळे त्यांना आपल्या जीवनाचे असे भव्य महाकाव्य बनवता आले.”

” पण साधनेची असली ही सांगता त्यांना सुखासुखी लाभलेली नाही, त्यासाठी त्यांना रक्ताचे अश्रू गाळावे किंवा गिळावे लागले आहेत. आपल्याच श्रद्धेचा दिवा करून अंधारात आणि वादळात काट्यांची वाट तुडवीत एकाकी चालावे लागले आहे. आज सारे जग त्यांचे कीर्तिगान गात आहे, त्यांच्या शतसांवत्सरिकीचा महोत्सव साजरा करीत आहे. पण त्यांच्या वाट्याला अपार अवहेलना आली होती. त्यांनाही एकाकी चालावे लागले होते. मनुष्य स्वभावाला धरून त्यांच्याही काळजाचा थरकाप झाला. पण ते हताश झाले नाहीत. त्यांची श्रद्धा ढळली नाही. नक्षत्रांवरचे त्यांचे लक्ष हुकले नाही. त्या नक्षत्रावर आणि त्या श्रद्धेवर विसंबून ते स्वतःला धीर देत राहिले. आपल्याच बरगडीची वज्रशलाका करून एकटेच एकटे चालत राहिले. असतातून सताकडे, तमसातून ज्योतीकडे, मृत्यूतून अमृताकडे.”

“आनंदयात्री रविंद्रनाथ”— बा.भ.बोरकर.